#पिंपळपान:जुन्याच पण छान आठवणी
अशीच एक मे महिन्याची सुट्टी चाललेली आणि आमचा गोंधळ. दुपारच्या उन्हात मात्र बाहेर खेळायला परवानगीच नव्हती. मग कुणाच्याही घरी खेळत बसायचं.
त्यात एका दिवशी आईला माझया मावशी ने बोलावलं होतं. त्या दोघी कुठंतरी जाणार होत्या. म्हणजे 4 तासांची निश्चिती. मी 4 थीत होते म्हणजे तेवढी एकटी रहायचे. आजी आजोबा काकांकडे गेले होते, बाबा कामावर, म्हणजे मी आणि भाऊ घरात. आम्ही घर सोडून जायचं नाही म्हणजे सगळा मित्रमंडळींचा गोतावळा आमच्या घरी हे ठरलंच.
बराच धुडगूस घालून झाला. नवीन काय खेळायचं यावर मारामारी होऊन सुद्धा ठरेना.
मग आमचा तारणहार- म्हणजे मन्या बारीक डोळे करून म्हणाला- एक आयडिया आहे
आम्ही- सगळं विसरून- बोल बोल
मन्या- आपण प्लॅंचेट करू. नाहीतरी यांच्या घरात कोणीच नाही.
आम्ही- पण करायचं काय?
मग मन्याने आम्हाला प्लॅंचेट चा थरार सांगितला. सगळेच पाचवीपर्यंतचे. मी मन्याला विचारलं- पण येतं का तुला ते?
मन्या- नाही. आत्ताच करायचे आपण ते. आपोआप येईल. काही अवघड नाहीये. ते भूतच सांगेल सगळं आपल्याला.
भूत???? -आम्ही.
मन्या- आत्मा म्हणजे भूतच असतं. घाबरायचं काय? मेलेले असतात ते.
आमच्यातला एक- अरे भूत काहीपण करू शकतं
मन्या- जे घाबरत असतील त्यांनी घरी जा.
माझा भाऊ- ताई, मी आईला सांगणार , आपल्या घरी मन्या भूत घेऊन आला- इयत्ता पहिली
मन्या- बाईना सांगितलंस तर भोवरा खेळायला घेणार नाही तुला.(बाई म्हणजे माझी आई. ती क्लासेस घ्यायची)
भाऊ- नाही सांगणार आईला. मला घेणार ना भोवरा खेळायला?
मन्या- हो
झाली आमची तयारी. एका पाटावर A ते Z पर्यंत, दोन गोलात yes आणि no, 1 ते 0 आकडे, मध्ये एका गोलात उलटी वाटी. मन्याला सगळं माहीतच असायचं.
मग प्रार्थना करून आत्म्याला बोलवायचं ठरलं. शेजारच्या एक नुकत्याच गेलेल्या आजोबांना बोलवू असं एक मैत्रीण म्हणाली- ते आपल्याला ओळखत होते ना, सगळं बरोबर सांगतील
मन्या- ते? काही नको, आपले किती बॉल घेतले त्यांनी दुपारी खेळतो म्हणून? ते नको
मग पलीकडच्या आजी, आपले कुठले तरी गेलेले नातेवाईक असं सगळं आठवून झालं.
शेवटी मन्यानेच एक नाव फायनल केलं. - तुम्हीपण ओळखलंत ना????
बरोब्बर- महात्मा गांधी
ते आपले सगळ्या पोरांच्या प्लॅनचेट करता कायम हजर असायचे. शिवाय सत्यवचनी.
ठरलं. घरातले सगळे पडदे ओढून नीट अंधार करण्यात आला. आम्ही महात्मा यायच्या आधीच हादरलेलो. मन्या मात्र नीट डोळे बंद करून वाटीला बोट ठेवून गांधीबाबाना बोलवत होता.आम्ही मन्याकडे, मन्या वाटीकडे एकटक पहात होतो. फरक इतकाच, आम्ही घाबरून आणि मन्या - इतका का उशीर लावतायत यायला असा पहात होता.
2 मिनिटे गेली असतील. वाटी लागली फिरायला. आले बाबा गांधीजी.
मन्या- चला पटापट विचारा प्रश्न. गांधीजी कामात असतात. त्यांना उशीर होईल
आम्ही भीतीयुक्त आदराने- हो मन्या?
मन्या -मग?मला माहीत आहे
मी- गांधीजी, माझा पहिला नंबर येईल का हो या वेळेला?
मन्या- अग, असतो की पहिला नंबर तुझा. दुसरं विचार.
मग मी मला लाल रंगाचा फ्रॉक मिळेल का? अजून कुणी आई जिलबी आणेल का? इथपासून मन्याबरोबरच्या मारामारीत मी जिंकेन का? असलेही गंभीर प्रश्न विचारून झाले. गांधीजींना काहीही प्रॉब्लेम आला नाही. सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरे.
मग मन्या- तुम्ही बावळट आहात.
आता मी विचारतो.
विचार विचार- आमचा कोरस
मन्या- गांधीजी, आता शाळेत गेलो तर जांभळाच्या झाडाला किती जामभळ असतील? वाघू(शाळेचा एक शिपाई- भीती वाटायची याची) असेल का सुट्टीत पण शाळेत?
झालं. आता गांधीजी पण वाघूला घाबरले. त्यांना काही हे उत्तर येईना. कारण मन्याचे दोन्ही हात प्रार्थनेत.
तेवढ्यात आई आली माझी. राम लक्ष्मण वगैरे ठीक हो, इथे आमचा धाकटा भाऊराया ताबडतोब बाहेर गेला आणि आपल्या घरात मन्या पांचट का काहीतरी करतोय आणि ताई, तिच्या मैत्रिणी गांधीजींना प्रश्न विचारतात हे ताबडतोब सांगितलं.
बाकीच्या गोष्टी आई हसून सोडून द्यायची,पण हे तिला नाहीच आवडलं. ती घरात आली आणि ओरडली- मनू, काय हे? कुठे पाहिलेस? कुणी शिकवलं? बाई आल्या म्हटल्यावर सगळ्यांनी फटाफट आवराआवर केली आणि पोबारा पण.
त्या दिवशी मात्र आईची बोलणी खाल्ली. आम्ही सगळ्यांनीच.
दुसर्या दिवशी मन्या -सविता, तुमच्या घरात गांधीजी फिरताना सापडले का ग? काल??
मी- भयानक घाबरून -नाही नाही
मन्या- ओरडू नको ग, घाबरते काय? दिसले तर म्हणावं थोडे दिवस इथे थांबा.आई बाहेर गेली की परत एकदा प्लॅंचेत करतो आणि तुम्हाला घरी पाठवतो. तोवर त्यांना भूक लागली तर आपल्या तला खाऊ देऊ थोडा थोडा. काय?
मागून मन्याची आई- गाढवा..... अजून आहेच का तुझं?