#पिंपळपान:जुन्या पण खूप छान आठवणी
लहानपणी आमच्या शेजारी मन्या म्हणून आमचा एक लीडर होता. आम्ही सगळे मुलं मुली त्याच्या अधिपत्याखाली बिनबोभाट सगळं करत असू. बाहेरच्या दुनियेत एखादी गोष्ट चूक असेल तरी मन्या म्हणाला तर ते आम्हाला ताबडतोब पटायचं आणि बाकीची दुनिया वेडी ठरवून आम्ही मोकळे. चिंचा, बोरं, कैर्या असले पदार्थ विकत घेतले तर पाप लागतं. ते झाडावरून पाडायचेच असतात, तर ते छान लागतात हे दिव्यज्ञान त्याला जन्मतः होतंच. परत कुठल्या झाडाची काय परिस्थिती, उदा. कैर्या लागल्यात का, चिंचा पाडायला काय करायला हवं, एखाद्या बंगल्यात वोचमन आहे का असल्या गोष्टींवर हा अगदी बारीक लक्ष ठेवून. मग त्यावर उपाययोजना पण हाच सांगणार. आम्ही फक्त तो सांगेल तसं वागणार. त्याची वह्या पुस्तकं आमच्या दप्तरात कोंबून त्याच दप्तर रिकामं करायचं, तोवर हा त्या झाडावर चढणार, सगळीकडे बारीक लक्ष ठेवून फटाफट कैर्या, चिंचा, जे काय असेल ते भराभर खाली टाकणार तोडून. आम्ही ते त्याच्या दप्तरात भरणार आणि कुणी यायच्या आत पोबारा करणार. मग घराच्या आधी एक मारुतीचं देऊळ लागे. तिथे वाटावाटी करून मन्याची वह्यापुस्तक, त्याचा वाटा त्याच्या दप्तरात कोंबून आम्ही साळसूदपणे आपापल्या घरी. असे अनेक प्रोग्रॅम मन्याच्या अध्यक्षतेखाली व्हायचे. बरं, त्याला कसलीच भीती कधीच वाटली नाही.
एकदा शाळेच्या रस्त्यावर असलेल्या आंब्याच्या झाडावर हा चढला. आम्ही 7-8 जण झाडाभोवती नेहमीसारखे रिंगण करून. दप्तरं रिकामी करून मन्या आता कैर्या टाकणार खाली एवढ्यात रखवालदार येताना दिसला. हा जोरात ओरडला, पळा, पळा घरी. ते काका आले पकडायला. आम्ही- आणि तू? मन्या- मी येतो बरोबर. त्यांना इतक्या उंच चढताच येणार नाही. तुम्ही जा.
आम्ही पळतपळत घरी येऊन त्याची वाट पहातोय. सगळे चिंताग्रस्त. मन्यापेक्षा त्याचं दप्तर घरी कसं देणार? तो कुठाय म्हणून काय सांगणार? सगळे बाहेरच. मन्याची आजी आली. मन्या कुठाय? आम्ही- नाही माहीत. आम्हीपण त्यालाच शोधतोय
आजीला बरोबर माहीत होतं, काहीतरी घोळ आहे.
तेवढ्यात एकाला लांबून तो रखवालदार, अजून एक मनुष्य मन्याला घेऊन येताना दिसले. आम्ही घरी पळायच्या बेतात. पण आजींनी बरोबर थांबवलं आम्हाला.
त्या रखवालदाराबरोबरचा मनुष्य म्हणाला- हा तुमचा नातू का?
आजी- हो
तो मनुष्य- अहो, काय पोरगं भारी आहे... माझया बागेत आंब्यावर इतका उंच चढला होता, पडला बिडला तर काय म्हणून आधी फटके देईन म्हणून धमक्या देऊन आणि नंतर चक्क हातापाया पडून उतरवलाय खाली.
मन्या- नाही ग आजी, यांना कुणालाच यांच्याच झाडावर चढता येत नाही. हे काय उतरवणार? माझा मीच उतरलोय.
तो मनुष्य- अहो, कैर्या चोरतात ही मुलं. आम्ही काय यांच्यासाठी लावलेत का झाडं?
आजी कस्नुषा होऊन- हो रे मन्या? तू कैर्या चोरायला चढलास यांच्या झाडावर?
मन्या- हॅट.. चोरायला चढलो असतो तर घाबरून रडलो नसतो का? तोडायला चढलो होतो.
मालक चिडून- तुझं झाड आहे का?
मन्या- तुमचंच आहे. पण खूप कैर्या खाल्ल्या की पोट दुखतं. किती कैर्या आहेत झाडाला... मस्त मोठ्या आहेत. इतक्या काही कोण खात नसतात. मग वायाच जाणार ना? म्हणून चढलो. शिवाय तुम्ही आत मागच्या बाजूला का लावलं नाही झाड? स्वतः शाळेच्या वाटेत लावायचं आणि आम्हाला बोलायचं?
आजी- ए मन्या- काय बोलतोस?
आम्ही,- मन्याचं बरोबर आहे.
मालक- गुरू भेटलास. यापुढे निदान विचारून चढ. पडलास तर मला केवढ्यात जाईल?
मन्या- काही पडत नाही मी. मला येतच. पण म्हणजे आता या झाडावर कधीपण जाऊ शकतो आपण.
आजी आणि मालक एकमेकांकडे हताश होऊन पहातायत आणि शेवटी आजीकडे चहापाणी होऊन सुटला प्रश्न.
आम्हाला काय- एक अक्ख झाड मिळालं ना राव. अजून काय हवं?
जय मन्या।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा