हल्लीच रोज एक काका डबा न्यायला येतात दुपारचा. अगदीच नवीन म्हणून फार बोलणं होत नव्हतं त्यांच्याशी गेल्या ५-६ दिवसांपर्यंत.
मग एके दिवशी स्वतःच म्हणाले- खूप छान असतं हं जेवण. मला अगदी आवड्लं.
आम्ही आपले धन्यवाद वगैरे म्हणालो.
मग त्यांच्याकडून कळालं की आत्ताच्या करोनाकाळात त्यांच्या पत्नी ४ महिन्यांपूर्वी गेल्या. आता ते एकटेच.
ऐकूनही कसंतरी झालं.
म्हणाले अहो-सगळा स्वैपाक येतो मला. अगदी पोळीसुद्धा. खूप गोल नाही झाली तरी करतो मी चांगली. घरात सगळं सामानही आहे. पण मला अंगावर येतं हो घर. मी नाही करत अजुन काही.
मी काहीच बोलू शकले नाही.
मगाशी आले . मूड दिसत नव्हता. नवर्याने विचारलं- काका- बरं नाही का?तर सांगत होते-मी छान आहे. आमच्याकडे ना, चहा चं डिपार्ट्मेंट माझ्याकडेच असायचं कायम. मी चहा करेतो ती बाकीचं आवरायची.
आता आज काय झालं- सवयीने दोन कप चहा टाकला मी.
चहा झाला आणि ते दोन कप पाहिले- वास्तवाची जाणीव झाली.
आता आजचा दिवस गेला माझा कामातून. दिवसभर आता काही सुचणार म्हणून नाही दुसरं काही.
आईशप्पत. तुटलंच आत काहीतरी.. गप्पच होउन गेलोय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा